
माणदेश एक्सप्रेस न्युज/नांदेड : “बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळाभेट दिली असती. मात्र, त्यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आज कोणत्या दिशेने गेला आहे, हेच कळत नाही,” अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नांदेडमध्ये झालेल्या भाजपच्या ‘शंखनाद’ सभेत ते बोलत होते.
शहा म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर परदेशात पाठविलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावर उद्धव ठाकरे यांनी ‘वरात’ असा उल्लेख केला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, पाकिस्तानला झुकवणाऱ्या या ऑपरेशनने जगभर भारताची ताकद दाखवून दिली आहे. भारतीय हवाई दलाने २२ मिनिटांत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यांच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनाही हवेतच निष्प्रभ करण्यात आले.
शहा पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानप्रती स्पष्ट भूमिका घेतली आहे. रक्त सांडणाऱ्यांना आता पाणीही मिळणार नाही, असे जाहीर करत त्यांनी नेहरूंनी केलेला सिंधू जलकरार थांबवला आणि व्यापार संबंधही तोडले. जर पाकिस्तान पुन्हा दहशतवादाच्या मार्गावर चालत राहिला, तर त्याला कडवा धडा शिकवला जाईल.”
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मुद्द्यावरूनही शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “दशकानुदशके सत्तेत असूनही शरद पवारांनी मराठी भाषेसाठी काहीच केले नाही,” अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अमित शहा यांनी केंद्र सरकारच्या आरोग्य क्षेत्रातील कामगिरीचेही कौतुक केले. “मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने केवळ ३७ हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही रक्कम १ लाख ३५ हजार कोटींवर नेण्यात आली. म्हणजेच, काँग्रेसच्या तुलनेत एक लाख कोटींहून अधिक निधी वाढवण्यात आला आहे,” असा दावा त्यांनी केला.