शेअर बाजारात उसळी; भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था ठरल्याचा सकारात्मक परिणाम

0
76

सेन्सेक्स ६५० अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांत उत्साहाचे वातावरण

माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई – भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजारात आज सकाळपासूनच जोरदार तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ६५० अंकांनी वधारून ८२,३०० च्या पुढे पोहोचला असून, निफ्टी १७५.७ अंकांनी वाढून २५,०२८ वर स्थिरावला. गुंतवणूकदारांत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने बाजारात जोरदार खरेदीचा ओघ पाहायला मिळाला.

 

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी रविवारी  जाहीर केलेल्या माहितीनुसार, भारताने जपानला मागे टाकत अमेरिकेचा, चीनचा आणि जर्मनीचा मागोवा घेत चौथे स्थान पटकावले. या घडामोडीचा बाजारावर थेट परिणाम झाला असून, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे जाणवते.

 

मागील काही दिवसांतील जागतिक घडामोडींचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन महासंघावरील रेसिप्रोकल टॅरिफ वाढवण्याचा इशारा दिला होता, मात्र तो निर्णय जुलैपर्यंत लांबणीवर टाकल्यामुळे जागतिक बाजारात स्थिरता निर्माण झाली आहे.

 

 

महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, टायटन, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एनटीपीसी, पॉवर ग्रिड आणि बजाज फिनसर्व या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तसेच बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, नेस्टले इंडिया, अदानी पॉवर, पेटीएम, माझगाव डॉक, हिंदुस्तान पेट्रोलियम, भेल आदी कंपन्यांनीही चांगली कामगिरी केली.

 

दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की निर्देशांक वधारले असले तरी, हाँगकाँगचा हेंगसेंग व चीनच्या शांघाय कम्पोजिटमध्ये घसरण झाली आहे. दुसरीकडे अमेरिकन बाजारही किरकोळ घसरणीसह व्यवहार करत आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here