
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : २२ मे – धुळे येथील शासकीय विश्रामगृहात विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यादरम्यान सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकड प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषींवर कुठलीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धुळ्यातील प्रकार अत्यंत गंभीर असून, सत्य जनतेसमोर येणे अत्यावश्यक आहे. विधिमंडळ समित्यांवर संशयाची सावली पडणे ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे. याला कदापी सहन केले जाणार नाही.” ते पुढे म्हणाले, “विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांना मी समितीमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची सूचना करणार आहे. विधिमंडळ समित्यांची एक गौरवशाली परंपरा आहे. ही प्रतिष्ठा जपण्यासाठी सखोल व पारदर्शक चौकशी अनिवार्य आहे.”
या प्रकरणात ज्याच्या खोलीत कोट्यवधींची रोकड आढळली, त्या कक्ष अधिकारी किशोर पाटीलला निलंबित करण्यात आल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केल्याचे आम्ही स्वागत करतो. विधानमंडळ स्तरावरदेखील निष्पक्ष चौकशी केली जाईल.”
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही कठोर भूमिका घेत, “या प्रकरणाची चौकशी निश्चित केली जाईल. कोणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आमच्यासाठी विधिमंडळाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे,” असे स्पष्ट केले.