
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : महाराष्ट्रात गुटखाबंदी केली असली तरी, आटपाडी शहरात बंदी असलेल्या गुटख्यासह सुगंधित पानमसाला, तंबाखू याची दिवसाढवळ्या स्टॉल, टपर्या अगदी काही किराणा दुकानातूनही विक्री मोठ्या प्रमाणत होत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून उघडपणे गुटख्याची शहरात विक्री होते आहे.
कायद्याने बंदी असलेला गुटखा, सुगंधी पानमसाला तंबाखू हा अनेक किराणा दुकानातही उघडपणे विकला जातो. गुटख्यावर कारवाईची जबाबदारी अन्न प्रशासन विभागासह पोलिसांची आहे. मात्र या गुटखा विक्रीविरोधी लोकप्रतिनिधी, राजकारणी यांनीदेखील आवाज उठवणे गरजेचे आहे. शहरासह ग्रामीण भागातून गुटखा विक्री, तस्करी, उत्पादन व साठवणूक सर्रास सुरू आहे.
मध्यंतरी अन्न-औषध प्रशासनाच्यावतीने शहरातील एका होलसेल व्यवसायिकावर कारवाई केली. पण, ही कारवाई काही दिवसांपुरतीच होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुटख्यासाठी वापरल्या जाणार्या सुगंधी पानमसाला व तंबाखूची विक्री होते. त्याचे उत्पादन हे शेजारील कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनके व्यवसायिक खाजगीत बोलत असतात.
शहरातील काही पान टपऱ्या या सुगंधी माव्यासाठी प्रसिद्ध असून, सर्व कायदे, नियम धाब्यावर बसवून उघडपणे मावा व गुटख्याची विक्री होते. या गुटखा विक्रेत्यांना पकडून त्यांची कसून चौकशी केली जात नाही. त्यामुळेच गुटखा पुरवणारे, तस्करी करणारे, उत्पादक यांच्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचत नाहीत. सुंगधी मावा व गुटख्यातून तरुणाई नशेचा विळख्यात अडकत चालली आहे. ते आरोग्याला घातक ठरत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा, संबंधित विभागांनी केवळ थातूरमातूर कारवाई न करता गुटखाबंदीची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.