
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम राबविण्यात आली असून ज्या नागरिकांच्य भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी असतील त्यांनी नगरपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी केले आहे.
आटपाडी शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शहरात भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिक यांना त्रास होत असून त्यांचा बंदोबस्त करावा. तसेच भटक्या कुत्र्यांमुळे अपघात घडत असले बाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आटपाडी नगरपंचायतने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची निर्बीजीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
सदर मोहिमेअंतर्गत शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणेपूर्वी तीन दिवस आधी व शस्त्रक्रिया झालेनंतर तीन दिवस पशुवैद्यकीय तज्ञांच्या देखरेखेखाली ठेवण्यात येते व त्यानंतर त्यांना रेबीज लस दिली जाते. सदर कालावधीमध्ये पकडलेल्या श्वानांना खानपान, औषधोपचार यांची व्यवस्था केली जाते. तसेच ज्या भागातून त्यांना पकडण्यात आलेले असते त्या भागात त्यांना परत सोडण्यात येते. याकामी शहरातील नागरिकांना काही तक्रार असल्यास आटपाडी नगरपंचायतीशी संपर्क करावा. तसेच शहरातील प्राणीमित्रांनी सदर ठिकाणी भेट द्यावी व याविषयी काही सूचना असल्यास नगरपंचायतीस कळविण्यात याव्यात असे आवाहन मुख्याधिकारी वैभव हजारे यांचेकडून करण्यात आले.