मुंबई : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर उदयनराजे हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं होतं. शरद पवारांनी मराठा आरक्षणप्रश्नी लक्ष घालावं, अशी मागणी त्यांनी केली होती. आता, उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाप्रकरणी दोन अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यातील एका अर्जात सर्व राज्य सरकारना प्रतिवादी करण्याची विनंती केली आहे. तर, दुसऱ्या अर्जात ११ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. जर अशा पद्धतीने खटल्यांचे कामकाज सुरु राहिले तर इतर खटल्यांप्रमाणे ही केसपण प्रलंबित राहील,’ अशी चिंता उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.
यासोबतच, ‘केस प्रलंबित राहिल्यास मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण होईल. आजही समाजात या दिरंगाईची खदखद वेगवेगळ्या रुपाने बाहेर येताना दिसत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात तुम्ही स्वतः लक्ष घालावे. तसेच, मराठा आरक्षणाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करु नये. तशा सूचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गीलावावा,’ अशी मागणी देखील उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
