मुंबई : बांधकाम क्षेत्राला मुद्रांक शुल्कातील सवलतीं पाठोपाठ सर्व प्रकारच्या अधिमूल्यात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ही सवलत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू राहणार असून लाभधारक विकासकांना घरखरेदीदारांचे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विकासकांबरोबरच त्याचा खरेदीदारांना लाभ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण ठाकरे सरकारच्या याच निर्णयावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली.
“गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार… उध्दवा अजब तुझे सरकार”, हे गाणं त्यांनी ट्विट केलं. पुढे ते ट्विटमध्ये म्हणाले, “लॅाकडाऊनमध्ये गोरगरीबांना कोणतीही सवलत न देणारे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणारे उद्धव ठाकरे सरकार बिल्डरांना सर्व प्रकारच्या अधिमूल्यात ५०% सवलत खैरातीचा निर्णय घेते हे पाहून एकच गाणे आठवते…”
“इथे नागरिकांच्या नशिबी कोंडा, कंत्राटदांराना मणीहार… उध्दवा अजब तुझ सरकार! कारण मंत्र्यांच्या गाड्यांना सरकार पैसे देतं. कंत्राटदारांची बिल द्यायला सरकारकडे पैसे आहेत. खोट्या बिलांचे पैसे दिले जातात. पण वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नाही. मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलत मिळत नाही”, अशी टीकादेखील त्यांनी केली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
