मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
“शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी मोदींनी नवे कृषी कायदे आणले आहेत. हे राजकीय आंदोलन आहे. हेच उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५० हजार देणार बोलले होते. त्याचं काय झालं? किमान १० हजार तरी द्यावेत. शेतकऱ्यांच्या हिताचं तसंच न्याय देण्याचं कोणतंही काम सध्याचं सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही,” अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
“सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन तीन महिने होत नाहीत, बेस्टचंही तसंच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही. निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
“हे राजकीय आंदोलन असून राजकीय खेळी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचं एकही काम या सरकारने केलेलं नाही, आता पुळका आला आहे. ते बिल शरद पवारांनी आता वाचलं असेल, यापूर्वी तेच प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. हे चुकीचं आहे का ? मग विरोध कशाला? धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी यावेळी केली.
“नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा केला असून शेतकरी खूश आहेत. फक्त राजकीयदृष्ट्या भाजपाच्या विरोधातील लोक एकत्र आले आहेत. भाजपाला जे यश मिळत आहे ते पाहवत नाही म्हणून पोटदुखीमुळे आंदोलन सुरु आहे,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
