नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. सरकार शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहे.
पंतप्रधान म्हणाले,”मी नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे की, शेतकऱ्यांपासून ते फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत,” असं मोदी म्हणाले.
“सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. सर्व विषयांवर चर्चा केली जाईल. सर्व पक्षांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल. कृषीमंत्री नरेद्र सिंह तौमर यांच्याकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. आपल्या समर्थकांना याबद्दल सांगावं. चर्चेतूनच तोडगा निघायला हवा. आपण सगळ्यांनी देशाबद्दल विचार करावा लागेल,” असं आवाहन मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
