पुणे : पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नवं माध्यम स्वीकारलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. माझा उच्चार व्यवस्थित व्हावा, यासाठी मी मास्क काढला, नाहीतर तुम्ही म्हणाल या बाबानेच मास्क घातला नाही आणि आम्हाला सांगतोय, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर, तर जनतेने सांगितलं तोपर्यंत. जनता म्हटली घरी बसा, की चाललो आम्ही. पण सीईओ बघा… जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर असतो. शिवाय प्रमोशन होत जातं. अभिनेता, कला, संगीत, पत्रकारिता अशी वेगवेगळी क्षेत्र निवडू शकता. असं क्षेत्र निवडा ज्यातून आनंद आणि पैसे मिळतील, याचा विचार करा. नाहीतर घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे, ‘आला मेला’ असं नाही झालं पाहिजे, असा विनोदही अजित पवार यांनी केला.
राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय आणि अडकलोय. कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असं अजितदादा हसत म्हणाले. कोणत्याही क्षेत्रात जा, पण आई वडिलांचे नाव रोशन करा, असा सल्ला उपमुख्यमंत्र्यांनी दिला. चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा, विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, मित्रच बरबाद करायला असतात, असे टोमणेही अजितदादांनी मारले.
मी पहाटे पाच वाजता उठलो आणि तासभर व्यायाम केला. सात वाजता एक उद्घाटन केलं. लोक विचारतात झोपला होता का? काही पुढाऱ्यांचं पोट एवढं पुढे आलंय, काय सांगावं काही कळत नाही. स्टेजवरही काही लोक सुटायला लागले आहेत. तुम्ही म्हणाल तुमच्या मागे बसलेल्यांना सांगा. त्यामुळे मुलांनो व्यायाम करा. बायको आल्यावर काही जण आई वडिलांना विसरुन जातात, असं करू नका. आई वडिलांचा विचार करा, असा मोलाचा सल्लाही अजित पवारांनी दिला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
