मुंबई : केंद्राने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही सरकारला सार्वजनिक कंपन्या विकू देणार नाही, त्यासाठी उग्र आंदोलन छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही आक्रमक भूमिका जाहीर केली. कोविड काळात शेअर मार्केट खेळण्यासारखं झालं होतं. आता शेअर मार्केट सावरलं आहे. सेन्सेक्स वाढला आहे. कारण केंद्राकडून सरकारी कंपन्यांचं खासगीकरण केलं जाईल असं कंपन्यांना वाटत आहे. त्यामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढली आहे. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत सरकारला पब्लिक सेक्टर विकू देणार नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.

केंद्र सरकारने कोव्हिडनंतर आपलं पहिलं बजेट सादर केलं आहे. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारी पाहिली तर केंद्राच्या तिजोरीत 19,76,424 लाख कोटी रुपये आहेत. सेन्सेक्स वाढल्याने अनेकांना सरकारने चांगलं बजेट मांडलंय असं वाटत आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे, असं त्यांनी सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोव्हिड काळात कामगार किंवा आयटी सेक्टरमधील कामगार हे व्हर्च्युअली काम करत होते. लॉकडाऊनमुळे ज्यांचं पुनर्वसन झालं त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना नातेवाईकांच्या रेशनकार्डवर धान्य घ्यावं लागत आहे. त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
चायनीज अॅप बंद करण्यास आमचा पाठिंबा आहे. इंग्लंडमध्येही कंपन्या विकण्याचा प्रयोग करण्यात आला. पण त्यांनी सरकारी कंपन्या विकल्या नाहीत, आपल्याकडे मात्र सरकारी कंपन्या विकण्यावरच भर दिला जात आहे, असं सांगतानाच केंद्र सरकारचं धोरण झिंगलेल्या दारुड्या सारखं असल्याची टीकाही त्यांनी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
