बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी पाच राज्यांमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.
पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे. परंतु लोक निर्णय घेत असतात. पण त्या राज्यांची स्थिती मला माहित आहे त्यामध्ये माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही, असे शरद पवार म्हणाले.
तामिळनाडूमध्ये आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्या बाजूने आहे. ते राज्याचं सूत्र हातात घेतील लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तविले आहे.
पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस