मुंबई : कोरोनानंतर राज्यात बर्ड फ्ल्यूने थैमान घातले आहे.दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे नागरिकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवल्याने पोल्ट्री चालविणाऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. मात्र या पोल्ट्री व्यावसायिकांसाठी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी यासंदर्भात माहिती सांगितली.
पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले की, बर्ड फ्ल्यू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या 1 किमी परीघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत 130 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रु. 20/- प्रति पक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. 90/- प्रति पक्षी, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. 20/- प्रति पक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु 70/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. 3/- प्रति अंडे, कुक्कुट पक्षी खाद्य रु. 12/- प्रति किलोग्रॅम, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक रू. 35/- प्रति पक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक रु. 135/- प्रति पक्षी,अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या 1 किमी परीघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
