माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : राज्यामध्ये सुरु असलेल्या तलाठी भरती परीक्षेमध्ये सर्व्हर डाऊन झाला असून विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले असून यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.
अकोला जिल्ह्यातीस बाभूळगाव आणि कापशी येथील परीक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सकाळी ९ ते ११ ही परीक्षेची वेळ होती. मात्र अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी बंद पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागत आहे. नागपूरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. नागपूर येथील बीएमव्ही महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर देखील विद्यार्थांना वर्ग खोल्यात प्रवेश मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात हाच प्रकार समोर आला असून यामुळे परीक्षा केंद्रांच्या बाहेर परीक्षेसाठी दूरून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. ज्या कंपनीकडे या परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे त्या कंपनीकडून अद्याप विद्यार्थ्याना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.