कवींना काहीतरी सुचलं की तो शब्द लिहत जातो आणि मग त्या शब्दांच रूपांतर पुन्हा ओळीमध्ये होत आणि मग त्याच गीत. तसचं या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला काहीतरी सुचलं त्यांनी त्यावर कहाणी लिहली आणि याच महिन्यात चित्रपट रिलीज झाला ज्याच नाव ‘बाईपण भारी देवा’ !
पण खरंच बाईपण भारी आहे का? खरंच बायकांचा विचार केला जातोय का ! बाईपण भारी देवा हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये हजारो महिला गेल्या. जातानाही त्यांच्या मनामध्ये खुशी होती. येताना त्याच्याहून जास्त खुश होत्या. आनंद होता तो चित्रपट बघायला गेलो याचा त्यातील एक बाई शेजारी राहत असणाऱ्या बाईला बाईपण भारी देवा हा चित्रपट रिलीज झालाय सांगत आली.
पण चित्रपट बघण्यासाठी परवानगी मात्र सासू सासरे नवऱ्याची काढावी लागणार होती. सासरच्या लोकांना विचारायचं कंस मनात तिच्या भीती दाटलेली. शेजारच्या बायकांचं नाव पुढे करत परवानगी मिळवली. पण आता चित्रपट बघण्यासाठी तिकीट काढावी लागणार होती. नवऱ्याकडे पैसे मागू तरी कसे म्हणून हात आखडत बोलली. आता पैसे मिळाले होते. पण घरातली तारेवरची कसरत ही तिलाच करावी लागत होती. तसं ‘राधा वाढा उष्टी काढा’ हे पण तिच्याच वाट्याला आलं. नवऱ्याच्या डब्यापासून ते मुलांना शाळेत सोडून परत येते. तोपर्यंत सासू सासऱ्याच्या औषधाची वेळ झालेली.
आता सगळी काम झाली म्हणत तिने आवरायला घेतलं आणि घरातून बाहेर पडतेच तोपर्यंत गाडी गेली अस समजलं आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावर निराशा आली. आज जाता नाही आल उद्या नक्की जाऊ अंस म्हणत तिनेच तिच्या मनाची समजूत काढली. पण उद्याही तेच असणार होत पहिले पाढे पंचावन्न म्हणावं तशी तिची अवस्था असणार होणार होती. पण हे मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही आणि तरीसुद्धा म्हणल जातं की बाईपण भारी देवा!
गेल्या महिन्यातली गोष्ट पुण्यामध्ये भरदिवसा एका मुलीवर हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला.आजही एक स्त्री सुरक्षित नाही तिच्या सुरक्षिततेसाठी पाहिजे तो प्रयत्न ही केला जात नाही. आणि केलाच तर ती मुलगी आहे म्हणून तिने घरातून बाहेरच पडता कामा नये. अशी ही परिस्थिती.
आजची ही वस्तुस्थितीच बनली आहे, की ५०% मिळालेल्या मुलाला शिकण्यासाठी शहरात पाठवलं जातं आणि मुलीने ७५% मार्क मिळवूनही तिला चार भितींच्या आत तुझ काय ते आयुष्य अस म्हणलं जातं.लाखो रुपये खर्च करून मुलांना शिकवलं जातं सगळ्या सोईसुविधा उपलब्ध होत असूनही मुलींना शिक्षण घेण्यास मनाई केली जातेय. बाईच्या जातीचा शिकून तरी काय उपयोग? शेवटी तिला चूल आणि मूल एवढंच करायचं आहे असं म्हणून शेवटी तिच्या मनावर नाराजी आणतात आणि तरीसुद्धा आपल्याला वाटतं की बाईपण भारी देवा !
ती एक स्त्री असून दिवस रात्र ती घरासाठी झटत असते.सासू, सासरे, नवरा, नणंद, भावजया, मुल बाळ, येणार जाणारे पाहुणे सगळ्यांचं तीच करते. तरीसुद्धा तू काय काम करते याच ओझं तिच्या मनावर कोरंल जातं. महिन्यातले चार दिवस सुद्धा तिचा त्रास कमी होत नाही. त्या चार दिवसांमध्ये तिला होणारा त्रास होणाऱ्या वेदना या सगळ्याला ती सामोरी जात असते. परंतु महिन्यातले चार दिवस तरी मलाही कोणीतरी समजून घ्यावं असं तिला वाटत असत पण इथेही स्त्री चे ते चार दिवस म्हणजे विटाळ समजून घराच्या एका कोपऱ्यात बसवले जाते. आणि तरीही तुम्हाला वाटतं की बाईपण भारी देवा! खरंच बाईपण भारी आहे का हा प्रश्न अजूनही मनात आहे. फक्त चित्रपट बघून स्टेटस टाकून फक्त बोलून फोटो काढून काहीच नाही होणार.
ज्यावेळी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेईल सगळे लोक तिच्यातला चांगुलपणा स्वीकारतील जेव्हा ती फक्त एक स्त्री नाही तर एक आदर्श स्त्री आहे असे सगळे जण म्हणतील. जेव्हा त्या स्त्रीला तुझं आयुष्य तुला हवं तसं जग तू चार भिंतीच्या आत न राहता तू स्वतःच्या पायावर उभे रहा तुला उंच भरारी घेण्यासाठी आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. तू लढ आम्ही खंबीरपणे साथ देऊ पण तू धीर सोडू नको असं ज्या दिवशी घडेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने म्हणता येईल. खरंच बाईपण भारी देवा……!
कु. रेश्मा आत्माराम राजगे
[email protected]
