आटपाडीच्या आठवडी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ ; मोबाइलवर मारला डल्ला !
बाजाराच्या दिवशी पोलीस बंदोबस्त असावा, असी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी च्या आठवडी बाजारात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी भरलेल्या या बाजारातून नागरिकांचे चार मोबाइल चोरीला गेल्याने खळबळ उडाली. बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मोबाइलवर डल्ला मारल्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातून मोबाईलची चोरी झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाणे येथे धाव घेत चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली असून बाजाराच्या दिवशी पोलीस बंदोबस्त असावा, असी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.
आटपाडी शहरातील आठवडी बाजारात खरेदीसाठी आसपासच्या गावातून महिला व पुरुषांची मोठी गर्दी होते. बाजारात गर्दीचा फायदा घेत सातत्याने भुरटे चोर व पाकीटमार यांच्यामुळे नागरिकांना अनेकदा फटका बसत असतो. शनिवारी आठवडी बाजारातून तब्बल चार नागरिकांचे मोबाइल चोरी झाल्याने नागरिक संतापले आहेत. विशेष म्हणजे दुपारनंतर बाजारातून मोबाइल चोरीला गेले असल्याचे पुढे आले आहे. दुपारच्या वेळी बाजारातून मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी नागरिक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते.