बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही : ‘स्वाभिमानी’चे महेश खराडे यांची माहिती
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : द्राक्ष बेदाण्यासह सर्व फळे खाणे आरोग्याला कसे हितकारक आहे हे सांगणारी जाहिरात टीव्ही वर सुरू करू तसेच बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याबाबत लवकरच निर्णय घेवू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील बैठकीत दिली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
मुंबई येथील सह्याद्री गेस्ट हाऊस येथे गुरुवारी द्राक्ष बेदाणा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तसेच ऊस वाहतूक दाराच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुरेश खाडे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजी खा. राजू शेट्टी. प्रा संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, प्रा.जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, यांच्यासह अर्थ खात्याचे सचिव नितीन करीर, पणन विभागाचे धपाटे,कृषी विभागाचे खतगावकर आदीसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माजी खा. राजू शेट्टी यांनी एक रक्कमी एफआरपी चा मुद्दा लावून धरला तसेच ऊस वाहतूक दाराच्या समस्या मांडून द्राक्ष बेदाणा उत्पादकाच्या समस्या ऐरणीवर आणल्या ताबडतोब ऊस उत्पादक, द्राक्ष उत्पादक आणि ऊस वाहतूकदार यांना न्याय देण्याची आग्रही मागणी केली.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी, कांदा उत्पादकाला जसे अनुदान दिले तसे द्राक्ष बेदाणा उत्पादकाला अनुदान द्यावे, द्राक्षे खाल्याने रक्ता भिसरण चांगले होते रक्तदाब नियत्रणात राहतो त्वचेला चकाकी येते अशी महत्व सांगणारी जाहिरात नॅशनल मीडियावर सुरू करावी, तेच धोरण आंबा, पेरू, चिक्कू सह सर्व फळासाठी घ्यावे, बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा या प्रमुख मागण्या त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या. बैठकीला संजय खोलखुंबे, भरत चौगुले, सुरेश वसगडे, उमेश मुळे, बाळासाहेब लिंबेकाई, प्रा. अजित हलीगळे, संदीप ताजोबा, संजय बेले, भागवत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
तर पुन्हा रस्त्यावर , लवकरच बेदाणा परिषद
द्राक्ष बेदाणा उत्पादकांचे प्रश्न आम्ही राज्य पातळीवर नेण्यात यशस्वी ठरलो आहोत हा पहिला टप्पा आहे. जाहिरात करणे, पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करणे, याबाबतीत सकारात्मक दृष्टीकोन आहे, त्याची पूर्तता न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू पण अन्य मागण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील तसेच लवकरच जिल्ह्यात बेदाणा परिषद घेणार असल्याचे खराडे यांनी सांगितले.