पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाचा परतीच्या प्रवासावेळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावजवळ मोठा अपघात झाला आहे. आज (२२ मे) सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलारवर धडकली. या अपघातात ३ भाविक जागीच ठार झाले आहेत. तर ७ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर या भाविकांना पुढील उपचारांसाठी अकोल्याला हलवण्यात आलं आहे. वाहनचालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. रात्रीपासून भाविकांचा हा प्रवास सुरु होता. भाविक अगदी त्यांच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

विठुरायाच्या दर्शनाने जीवन सफल झाल्याची भावना घेऊन परतणाऱ्या या भाविकांना समोर काळ उभा आहे याची कल्पनाही नव्हती. रात्रभर या वाहनाचा चालक वाहन चालवत होता. त्याला झोप येत होती. परंतु घर आता अवघ्या काही मिनिटांवर आहे, म्हणून तो तसाच वाहन चालवत राहिला. परंतु घरी पोहोचायच्या काही वेळ आधी हा अपघात झाला.