गळ्यात बेदाणा हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : मोर्चात होणार बेदाण्याचे मोफत वाटप : शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे : महेश खराडे
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : द्राक्ष व बेदाणा उत्पादक संकटात सापडला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकाच्या न्याय मागण्यासाठी बुधवार दिनांक १७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
खराडे म्हणाले, हा मोर्चा सकाळी दहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विश्रामबाग मधील पुतळ्या पासून प्रारंभ होणार आहे. यावेळी बेदाण्याचे मोफत वाटप कण्यात येणार आहे. मोर्चाला येताना प्रतेक शेतकऱ्याने बेदाण्याचा हार गळ्यात घालून यायचे आहे. तसेच उन्हाळ्याचा तडाखा जास्त आहे. त्यामुळ शेतकऱ्यांनी टोपी घालून यावे, सोबत पाण्याची बोट्टल ठेवावी.

राज्यात सांगली जिल्हा हा द्राक्ष व बेदाणा उत्पादक जिल्हा म्हणून म्हणून ओळखला जातो. यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ही प्रचंड नुकसान झाले. चार किलोची पेटी ७० ते १०० रुपयांना विकली. द्राक्षाला यंदा फारच कमी दर मिळाला. चिरमुरे १४० रुपये किलो आणि द्राक्षे २५ ते ३० रुपये किलो हे वास्तव आहे. द्राक्षाला दर नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला. पण बेदाणा उत्पादन यंदा प्रचंड झाले आहे. दरवर्षी १८ ते २० हजार गाडी बेदाणा उत्पादन होते. पण चालू वर्षी ते ३० हजार गाडी पर्यंत गेले आहे.
एक गाडी म्हणजे १० टन सुमारे तीन लाख टन उत्पादन झाले आहे. त्यामुळे मिरज आणि तासगाव तालुक्यातील सर्व कोल्ड स्टोरेज फुल्ल झाली आहेत. बेदाणा ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बेदाणे दर पडले आहेत. त्यामुळेच या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांस अनुदान देण्यात आले, त्याच धर्तीवर द्राक्ष व बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना एक लाखाचे अनुदान द्यावे ही प्रमुख मागणी आहे.
द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक ग्रामीण भागात रोजगार पुरवितात, औषध विक्रेत्यांना मोठा व्यवसाय देतात, वाहन धारकांना ही व्यवसायाची संधी देतात. त्यामुळे द्राक्ष व बेदाणा निर्मिती हे सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणाचा मुख्य स्त्रोत आहे. द्राक्ष शेती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, द्राक्ष उत्पादक शेतकरी टिकला पाहिजे, अनेक शेतकरी कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत, त्यांना आधार देण्याची जबाबदारी सर्वाची आहे. म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आणणार असल्याचे महेश खराडे म्हणाले.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी भरत चौगुले, संजय खोलखुंबे, बाळासाहेब लिंबेकाई, सुरेश वासगडे, उमेश मुळे, भरत पाटील, रावसाहेव पाटील, सुधाकर पाटील, अभिजीत चौगुले, जयकुमार चौगुले, शिवाजी पाटील, सूरज पाटील, दामाजी दुबळ, राजेंद्र माने, अमित रावताळे, निशिकांत पोतदार, अनिल पाटील, चंदु पाटील, आशिष पाटील, बाळासो खरमाटे, संदीप शिरोटे, अशोक खाडे, सतिष पाटील आदीसह अन्य प्रयत्न करत आहेत.