नवी मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात सातत्याने होणारे बदल यामुळे आपल्या अवीट गोडीने सातासमुद्रापल्याड एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या हापुसची चव अलिकडे आंबट झाली आहे. चार पैसे मिळवून देणारा फळ म्हणून हापूसकडे पाहिले जाते मात्र हाच हापुस निसर्गाची अवकृपा या संकटात सापडल्याने त्याचा उत्पादनावर अधिक परिणाम होत आहे. हवामान बदल, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याने यंदा उत्पादनात अधिक घट झाली आहे. यंदा अवघे १६% ते २८% उत्पादन असून मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी उत्पादन आहे.
एपीएमसीत फळ बाजारात एप्रिल-मे महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कोकणातील हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा उलट परिस्तिथी असून ऐन हंगामात केवळ १८ हजार ते २० हजार पेट्या दाखल होत आहेत. कोकणात दोन ते तीन वेळा मोहोर आला यामुळे मोठया प्रमाणात फळधारणा झाली नाही.

मोहोर संवर्धानात अडथळा व त्याचवेळी वातावरणात झालेल्या बदलांमुळे किड रोगांचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव या सर्वांचा परिणाम आंब्याचे खास करुन हापूस आंब्याचे उत्पादन घटण्यावर झाला. मार्चमध्ये अवकाळी पावसाच्या भीतीने वेळेआधीच आंबे तोडणी केल्यामुळे, कोकणातील सर्वच विभागातून एकाच वेळी हापूस दाखल झाल्याने मार्च मध्ये ३- ४ पटीने आवक वाढली.
यावर्षी कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन मोठया प्रमाणात घटून अवघे १६ ते १८ टक्यावर आले आहे. मागील ६ वर्षात सर्वांत कमी उत्पादनाचे हे वर्ष ठरत आहे. जागतिक हवामान बदलाचा फटका तापमान वृध्दी, अवकाळी अतिवृष्टी, आभ्राच्छादित वातावरण यामुळे यावर्षी उत्पादनात घट झाली आहे.