तेलंगणातील विकास पाहून तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. हैदराबाद येथील मुख्यमंत्री केसीआर यांच्या शासकीय निवासस्थानी माजी आमदार वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. नवभारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून, प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हे या पक्षाचे मूळ उद्दिष्ट असल्याने या पक्षाचा झेंडा हाती घेतला असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
महागाईच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. निघणारे पीक परवडणारे नाही. मात्र तेलंगणा सरकार अशा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, अशा योजना सातत्याने राबवीत आहेत. त्यामुळे मीसुद्धा बीआरएसच्या संपर्कात आहे. तसाही मी स्वतंत्र आहे. त्यामुळे जो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील, त्यांच्यासोबत जाण्यास काहीच हरकत नाही, असे मला वाटते. नव्हे तर बीआरएससोबत गेलेच पाहिजे, असे वाघमारे यांनी सांगितले.

तेलंगणासारख्या योजना महाराष्ट्र राज्यात का राबवल्या जात नाही, असा प्रश्न माझ्याही मनात येतो. तेलंगणातील शेतकऱ्यांचा विकास कसा झाला, हे या राज्यातील लोकांना सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात भारत राज्य समिती म्हणजे बीआरएसला प्रतिसाद मिळत आहे. तेलंगणा सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेते, त्यामुळे सामान्य माणसाचा विकास कसा साधता येईल, यासाठी विदर्भातील माजी आमदार वाघमारे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात राहून अभ्यास केला आणि विकासासाठी या पक्षाची धुरा हाती घेत असल्याचे ते म्हणाले.