पुणे : कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चारजणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि मालवाहू ट्रकचा रात्री 2:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. मध्यरात्री सर्व प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच अचानक हा अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांची भंबेरी उडाली. पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी भागात असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला झाला. या अपघातात 22 जण जखमी झाले. तर 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात 22 प्रवाशी जखमी झाले. या सर्वांना ससून आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.