माजी राज्यपाल सत्यपाल मलिक प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून, सीबीआयने समन्स बजावल्यानंतर पहिल्यांदाच सत्यपाल यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली असून, सीबीआयच्या कार्यालयात मी जाणार नाही. तर सीबीआयचे अधिकारी स्वतः भेटण्यासाठी घरी येणार आहेत, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले आहे.
माजी राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विविध कार्यक्रमांत त्यांच्याकडून अनेक वक्तव्ये केली जात आहेत. त्याचदरम्यान, सत्यपाल यांना सीबीआयने समन्स बजावल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यानंतर विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला गेला.

सत्यपाल मलिक यांनी एका हिंदी वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, सीबीआयचे अधिकारी त्यांच्या घरी येणार आहेत. संबंधितांशी चर्चा झाली आहे. त्यांना स्पष्टीकरण हवे आहे. दरम्यान, या प्रकरणात सीबीआयकडून २७ किंवा २८ एप्रिलची वेळ मागितली होती. या दिवशी सत्यपाल हे राजस्थानमध्ये असतील असे सांगितले जाते. त्यामुळे २८ एप्रिल किंवा त्यानंतर सीबीआयचे अधिकारी त्यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे.
बोगस सोशल मीडिया अकाउंट
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या नावाने असलेल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर केल्या जात आहेत. शुक्रवारी ज्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट केली गेली होती, ती सपशेल खोटी आहे. हे अकाउंट माझ्या नावाने अन्य कुणीतरी वापरत आहेत. त्याच अकाउंटवरून सीबीआयकडून समन्स बजावण्यात आल्याची पोस्ट शेअर करण्यात आली. अशा प्रकारचे माझ्या नावाने असलेले सोशल मीडिया अकाउंट बोगस आहेत, असे मलिक यांनी सांगितले.