सांगली : शिकाऱ्यांच्या सहा जणांच्या टोळीला वनविभागाने घेतले ताब्यात : करत होते “या” प्राण्याची शिकार
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : उदमांजराची शिकार करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिकाऱ्यांच्या सहा जणांच्या टोळीला वनविभागाने भाटवाडी (ता.वाळवा) येथे ताब्यात घेतले असून टोळीविरुध्द वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाटवाडी येथील तलावाकाठी शिकारीच्या उद्देशाने काही संशयित लोक वन्यप्राणी शिकारीच्या उद्देशाने फिरत असलेची माहिती वनविभागास मिळाली. सदर माहिती मिळताच महंतेश म. बगले, वनक्षेत्रपाल शिराळा, अजितकुमार पाटील मानद वन्यजीव रक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली दिपाली सागावकर, अनिल पाटील कायम वनमजूर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी चारचाकी गाडीतून पळून जाणेच्या तयारीत असलेल्या लोकांना मोटारीसह अडवून गाडीचा तपास घेतला असता, आसनाखाली लपवून ठेवलेला वन्यप्राणी उदमांजर (इंडियन स्मॉल सिवेट) आढळला. टोळीतील ६ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले व असून त्यांच्याकडील मृत उद मांजरसह वाघर, विजेरी, अल्टो चार चाकी आणि १ दुचाकी गाडी इत्यादी मुद्देमाल जप्त करणेत आला.