आटपाडी शेअर मार्केट फसवणूक प्रकरण : संतोष अडसूळ बरोबरच, आटपाडीतील काही डाळींब व्यापाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे
माणदेश एक्सप्रेस न्यूज : दि. ०८ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी फरार असलेला आरोपी संतोष धोंडीराम ढेमरे (वय ३९ रा.आटपाडी) याला सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे अटक केल्याने गुंतवणूकदार यांना दिलासा मिळाला असला तरी, एक “संतोष” सापडला दुसरा कधी सापडणार? असा सवाल गुंतवणूकदार करत आहेत. परंतु आता मात्र संतोष अडसूळ याच्या एक-एक कारनाम्याची माहिती पुढे येत आहे.
लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून महिन्याकाठी सुरुवातीला १५ ते २० हजार रुपये देण्याच्या आमिषाने अनेक बड्या धेंड्यानी आपली गुंतवणूक केली. यातून सावकरी पेक्षा जादा पैसे मिळू लागल्याने व याची “माउथ पब्लिसिटी” झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी देखील आपले सोने विकून, काहींनी जमिनी गहान ठेवून तर, काहींनी मधल्या-मधी मध्यस्थी करून पैसे मिळविले.
विशेष म्हणजे यातील बहुतांश गुंतवणूकदारांनी आपली महिन्या काठी येणारी ठरविक रक्कम पुन्हा मूळ मुद्दल मध्ये मिसळत गुंतवणूक केली. त्यामुळे सहाजिकच लाख रुपये वाल्यांचे वर्षामध्ये तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांच्यावर पैसे झाले. त्यामुळे सुरुवातीला लाखो मध्ये असणारी गुंतवणूक कधी करोडो रुपये मध्ये गेली हे समजलेच नाही. तर काही गुंतवणूकदारांनी महिन्याला मिळणाऱ्या हप्त्यातून अलिशान गाड्या घेवून जीवन जगू लागली.
त्यामुळे सर्वसामान्य गरीब होत गेले तर श्रीमंत हे श्रीमंतच होवू लागले. गुंतवणूक केलेल्या मध्ये विशेष करून राजकीय मंडळी बरोबरच पगारदार लोकांचा यामध्ये मोठा भरणा असला तरी, मध्यमवर्गीय लोक मात्र यामध्ये कंगाल झाले. ज्यांनी-ज्यांनी डाऊनपेमेंट भरून गाड्या घेतल्या त्यांच्यावर गाड्या विकण्याची वेळ आली, शिवाय त्यांचा सिबिल स्कोअर खराब झाल्याने त्यांना शासकीय तसेच निमशासकीय बॅंका कर्ज सुद्धा मिळेना.
खरे तर मध्यमवर्गीय लोकांना या योजनेमध्ये भुलून जावून पैसे भरले. बँका, पतसंस्था याचबरोबर सोने गहान करून ज्यांनी पैसे भरले त्यांचे सोने हि गेले अन वरून कर्ज मात्र डबल झाले अशी अवस्था झाली आहे. सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करून ज्यांनी-ज्यांनी लाभ घेवून बाजूला गेले ते मात्र या योजने मधून सुटल्याचे सुख, दु:ख झालेल्यांना सांगत त्यांच्या जखमेवर मोठ चोळण्याचे काम मात्र त्यांनी जरूर केले.
राहिला प्रश्न आता यात डाळींब व्यापाऱ्यांची चौकशी होणे का गरजेचे आहे? तर ते पुढील भागात पाहूया. (क्रमश:)