कोल्हापूर : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वरवर खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी शेती व त्या अनुषंगिक घटकांच्या तरतुदींना मोठ्या प्रमाणात कात्री लावली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास २६ हजार कोटींच्या योजना कमी आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना या महत्त्वपूर्ण योजनेतील ३१ टक्के रक्कम कापली असून, त्याचे परिणाम भविष्यात शेती व शेतकऱ्यांवर होणार हे निश्चित आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेची तरतूद ३१ टक्क्यांनी कमी केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार राबवत असते.
कृषी क्षेत्राचा विकास दर वाढवण्यासाठी ही योजना फलतृप्त ठरत असतानाच गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याचे ३,२८३ कोटी रुपये कमी केले आहेत.
