कोल्हापूर : जोतिबा मंदिर विकासासाठी १९९१ मध्ये पहिल्यांदा आराखडा करण्यात आला, तेव्हापासून आजतागायत चार आराखडे झाले. ज्याची रक्कम ३०० कोटींवर जाते. त्यापैकी प्रत्यक्षात फक्त अडीच कोटी रुपये देवाच्या पदरात पडले आहेत. गेल्या तीस वर्षांत ना तेथील गैरसोयी कमी झाल्या आहेत ना भाविकांना सोयी सुविधा मिळाल्या ना गावची स्थिती सुधारली आहे. आजही मंदिर व डोंगराची स्थिती जैसे थे आहे. मग गेल्या तीस वर्षांत काय विकास साधला याचा लेखाजोखा मांडण्याची गरज आहे.
कोल्हापुरातील श्री अंबाबाईनंतर जोतिबा हे सर्वात मोठे देवस्थान आहे. चैत्र महिन्यातील तीनदिवसीय यात्रेसाठी किमान ७ ते ८ लाख भाविक डोंगरावर येतात. याशिवाय दर रविवार श्रावण षष्ठी खेटे असा वर्षभर भाविकांचा येथे राबता असतो. त्यामुळे वर्षाकाठी किमान २५ ते ३० लाख भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. येथे देवाच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या भाविकांना सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी १९९०-९१ मध्ये डोंगर विकासाचा १४५ कोटींचा आराखडा करण्यात आला.

त्यावेळी नेमकी किती रक्कम आराखड्यासाठी वापरली गेली याची आत्ता माहिती मिळाली नाही. पण त्या आराखड्यात डोंगरावर दर्शन मंडप, सांडपाणी व्यवस्थापन, ड्रेनेज व गटर्स सिस्टीमला प्राधान्य देण्यात आले होते. पण प्रत्यक्ष आराखडा राबवताना झाले उलटेच. परिसराचा विकास तर झालाच नाही.
त्यानंतर चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते त्यावेळी म्हणजे २०१७ मध्ये पुन्हा विकास आराखड्याचा विषय निघाला. त्यांनी त्यांच्या स्टाईलने मोठ्या घोषणा केल्या परंतू पुढे काहीच झाले नाही. त्यावेळी जुन्याच आराखड्यामध्ये दुरुस्त्या सुचवून नवीन १५५ कोटींचा आराखडा केला गेला. त्यातील फक्त २५ कोटींच्या प्राथमिक कामांना मंजुरी दिली गेली. तत्कालीन पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी मनात आणले असते, तर नवे मंदिर ते उभारू शकले असते, परंतू त्यांनीही चैत्र यात्रेला जाऊन सासनकाठी पूजन करण्यापलीकडे काय केले नाही.