उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत सहा हजार क्यूसेकने पाणी सोडले आहे. ते पाच फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून या पाण्यामुळे भीमा नदीवर असलेले कोल्हापूर पद्धतीचे १७ बंधारे पूर्ण भरणार आहेत.

उजनी धरणातून उन्हाळ्यात शेती, पिण्यासाठी व इतर सर्व उद्योगासाठी पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. सोलापूर शहराला टाकळी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या नवीन दोन मोठे पंप बसविले आहेत. त्यामुळे टाकळी बंधाऱ्यातील पाणी उजनीचे पाणी पोहचेपर्यंत पुरेल, अशी वस्तुस्थिती आहे.
नियोजनानुसार उजनी धरणातून सोडलेले पाणी टाकळी बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर चिंचपूर बंधारे पूर्ण क्षमतेने भरून पुरेसा पाणीसाठा होईल. दरम्यान, या पाण्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरांना व भीमा नदीकाठावरील माढा व इंदापूर तालुक्यातील गावे व वाड्या वस्त्यांवरील नागरिक व पशुधनाला पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.