मुंबई : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करावा अशी मागणी करत एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुण्यात आंदोलन सुरू होते. दरम्यान, राज्य सरकारने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे. सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासूनच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम तत्काळ लागू करू नये, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दोन ते तीन वेळा आंदोनलही केले होते. दरम्यान, आज (३१ जानेवारी) पुण्यातील अलका टॉकिज येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आंदोलकांशी बातचीत करून दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आनंदात आहेत गोपीचंद पडळकर
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी गोपीचंद पडळकर यांना उचलून घेत त्यांच्या नावाचा जयजयकार केला. सरकारच्या या निर्णयावर पडळकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “आज विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या भावना सरकारने ऐकल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आनंदात आहेत. मात्र या निर्णयामुळे ज्यांना पोटशूळ उठला आहे, त्यांना रडत बसूद्या. त्याला पर्याय नाही,” असे पडळकर म्हणाले आहेत.
राज्यसेवा मुख्य परिक्षेतील वर्णनात्मक पद्धत अंमलबजावणी २०२३ ऐवजी २०२५ पासून करण्याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली.@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/HI1LJ99I3W
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) January 30, 2023