आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. या अभिभाषणात मूर्मू म्हणाल्या की, 2047 पर्यंत आपल्याला असे राष्ट्र घडवायचे आहे जे भूतकाळातील अभिमानाशी जोडलेले असेल आणि ज्यामध्ये आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असतील.

आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो ‘आत्मनिर्भर’ असेल आणि आपली मानवतावादी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल. याशिवाय एकही गरीब नसलेला देश बनवणे हे ध्येय असल्याचेही त्या म्हणाल्या. आपल्याला नवीन युग निर्माण करायचे आहे. असा भारत घडवायचा आहे, ज्यात गरीबी नाही, मध्यमवर्गही संपत्तीने भरलेला असा भारत आपल्याला घडवायचा आहे.
देशातील सध्याचे सरकार हे राष्ट्र उभारणीचे कर्तव्य पार पाडण्यात गुंतले असून, हे सरकार स्वप्ने पूर्ण करणारे सरकार असल्याचे मूर्मू म्हणाल्या. तसेच भारतात प्रगतीसोबतच निसर्गाची काळजीदेखील या सरकारकडून घेतली जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यापासून ते तिहेरी तलाक रद्द करण्यापर्यंत, सध्याच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आकांक्षा जागृत केल्याचे त्या म्हणाल्या. यामुळे आता मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने या समाजातील लोक नवी स्वप्ने पाहू शकत आहे.