“अजित पवारांचं स्टेटमेंट चुकीचं. ते अर्ध सत्य….”: अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर संभाजी राजेंची मोठी प्रतिक्रिया!
कोल्हापूर: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज धर्मवीर नव्हते या केलेल्या विधानावर आज माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली.
संभाजीराजे म्हणाले, “अजित पवारांचं स्टेटमेंट चुकीचं. ते अर्ध सत्य बोलले. संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे. पण संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे साफ चुकीचं आहे. संभाजी महाराज धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक होते, असं माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.

तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीसाहेब यांनी या हिंदवी स्वराज्याचं संरक्षण केलं. त्याबद्दल दुमत नाही. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचंही रक्षण केलं हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच, त्यापाठोपाठ ते धर्मरक्षकही आहेत. हे म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.
दरम्यान, कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना त्यावर अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका, अशी माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहील, असंही त्यांनी सांगितलं. संभाजी छत्रपती पत्रकार परिषदेत बोलत होते.