जळगाव : माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिवाळी अधिवेशनात माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नाही असाही आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
यावेळी खडसे म्हणाले, “मुख्यमंत्रीही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे समर्थन करीत आहेत. अधिवेशनात एकमेकांवर आरोप करण्यातच फक्त वेळ गेला. विदर्भात अधिवेशन असताना विदर्भाच्या प्रश्नाला न्याय नाही असा थेट आरोप करत एकनाथ खडसे यांनी कापूस उत्पादकांच्या अडचणीवर भाष्य केलं आहे. कापूस उत्पादकांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. 14 हजाराहून 6000 कापसाचा भाव गेला आहे त्यावर कुणीही बोलत नाही म्हणत खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या कोणत्याच प्रश्नाला या ठिकाणी विचारले गेले नाही, गंभीर प्रश्न बाबत सरकार हे असंवेदनशील आहे. तसेच, अधिवेशनात भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात आरोप झाले मात्र आरोप झाल्यावरही एकही जण पद सोडायला तयार नाही, उलट भ्रष्टाचाराच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करत आहे.अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर दिली आहे.