मुंबई : चीन, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतानं सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना पत्र लिहित भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आपल्या पत्रात म्हटले की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.

दरम्यान, यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे देखील केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आपल्या पत्रात म्हटले आहे.