मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, “मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा.
तसेच ते पुढे म्हणाले, “हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं, असे राज ठाकरे यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद निर्माण केला जात. मात्र यात महाराष्ट्राला नाहक त्रास सहन करावा लागतोय. सीमावादाच्या मुद्द्यावर सर्व पक्षांना एकत्र येण्याची भूमिका घ्यावी. तसेच केंद्र सरकारनेही या प्रकणात लक्ष घालण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.