बीड : राज्य सरकारने पोलीस भरती सुरु केली आहे.परंतु भरती संदर्भातील काही बाबी स्पष्ट नसल्याने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी केली आहे.
धनंजय मुंडेंनी केलेल्या ट्वीट करत म्हटले आहे कि, महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, अर्ज करण्याची वेबसाईट सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन असणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत असून, अजूनही अनेकांचे अर्ज करणे रखडले आहे.
तसेच, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र व काही कागदपत्रांत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे आधीही उमेदवारांचा बराच वेळ वाया गेला, त्यामुळे भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना किमान 15 दिवस मुदतवाढ देण्यात यावी. तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत केली आहे.