मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २६/११ मधील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केलं आहे. राज्यपालांच्या या कृतीने आणखी एका वादाला निमंत्रण मिळालं आहे.
माहितीनुसार, मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यात आज १४ वर्ष पूर्ण झाली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहिदांना अभिवादन केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चप्पल घालून शहिदांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केलं. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चप्पल काढून शहिदांना अभिवादन केलं. तर राज्यपालांनी थेट चप्पल घालून शहिदांना अभिवादन केल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ‘आम्ही शहिदांना अभिवादन करत असताना पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं, चप्पल घालून किंवा काढून अभिवादन करू शकता, त्यामुळेच राज्यपालांची चप्पल काढली नाही,असे म्हणत राज्यपालांच्या या कृतीची भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी सारवासारव केली.