ठाणे: भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा अफझल खानाला पत्रं लिहून माफी मागितली होती, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आव्हाड म्हणाले, “पाच वेळा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली होती हा ह्याच्या बापाने शिकवलेला का याला इतिहास. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एकच तह झाला. तह. तो झाला मिर्जाराजे जयसिंगांबरोबर. त्याला पुरंदरचा तह म्हणतात, मिर्जाराजेंबरोबरच्या त्या वाटाघाटीनुसार ते औरंगजेबाच्या दरबारी गेले. तिथे झालेला अपमान सहन न झाल्यामुळे जेवढे तहात किल्ले गेले होते त्यापेक्षा दुप्पट किल्ले औरंगजेबाकडून त्यांनी घेतले. हे होते शिवाजी महाराज, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या भावना जाणूनबुजून दुखावल्या जात आहे, असं मला वाटतंय. त्यांना वरच्यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी या अगोदर देखील शाहू फुले सावित्रीबाई यांच्याबाबत उद्गार काढले होते. महाराष्ट्राच्या मातीचा होईल तितका अपमान करायचा आणि हे दाखवून द्यायचं की तुम्ही मराठी माणसं माझं काही करू शकत नाही. असंच सुरू आहे, असे त्यांनी वक्तव्य केले.