मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जवळपास १०३ दिवसांच्या तुरुंगावासानंतर काल जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय राऊत यांचे ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी सकाळच्या वेळी माध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह राज ठाकरेंवरही निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, आज तीन महिन्यांनंतर हातावर घड्याळ बांधले आहे. तुरुंगात घड्याळ वापरण्यास बंदी होती. बाहेर आल्याबरोबर लोकांनी माझे जोरदार स्वागत केले. मला वाटले लोक मला विसरतील. मात्र तसे काही झाले नाही. कालच्या निर्णयानंतर माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे.
माझ्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई बेकायदेशीर होती. मला अटक होईल आणि एकांतात बोलण्याचा सराव करावा असे राज ठाकरे माझ्याबद्दल बोलले होते. मी त्यांना सांगू इच्छितो एकांतातला काळ मी सत्कारणी लावला. राजकारणात शत्रू तुरुंगात जावा अशी भावना असू नये. सावरकर, टिळकही एकांतात होते. सावरकरांसारखाच मी एकांतात राहिलो. एकांतामधील काळ मी सत्कारणी लावला, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.