मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल हा दोन दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबरला समोर येईल. कारण 20 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.