मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन येत्या शनिवारी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: दिपाली सय्यद यांनीच या प्रवेशाची माहिती दिली आहे.

दरम्यान, दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, निलम गोऱ्हे खासदार संजय राऊत यांच्यावरही तसेच, रश्मी ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “खासदार संजय राऊतच शिवसेनेच्या फुटीला जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच या सर्व गोष्टी घडल्या आहेत. राऊतांबद्दल एवढेच बोलले, त्यांना जी शिक्षा झाली ती त्यांच्या पापांची शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं राऊत उत्तम उदाहरण आहेत, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
महापालिकेतील खोके मातोश्रीवर येण्याचं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना लागली आहे. सुषमा अंधारे आणि निलम गोऱ्हे या सर्व चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा महत्त्वाच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.