….अन्यथा, वजन काटे विभागाला टाळे ठोकू : शंभर टन ऊस उत्पादकांची सुमारे 13 टन वजनाची चोरी होते !
सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर सम्राट ऊसाच्या वजनात काटा मारी करतात. सरासरी 13 ते 14 टक्के काटामारी होते.
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्याचे वजन काटे संयुक्त भरारी पथकाच्या माध्यमातून तपासावे अन्यथा वजन काटे विभागाला टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.
महेश खराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने वजनकाटा नियत्रंण विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर सम्राट ऊसाच्या वजनात काटा मारी करतात. सरासरी 13 ते 14 टक्के काटामारी होते. शंभर टन ऊस उत्पादकांची सुमारे 13 टन वजनाची चोरी होते. म्हणजेच ऊस उत्पादकांना 40 ते 45 हजाराला गंडा घातला जातो. ही मोठी दरोडेखोरी आहे. याबाबतीत हा विभाग कोणतीच कारवाई करत नाही केवळ पाकीट घेवून वजन काट्याची तपासणी केली जाते. भरारी पथक स्थापन होते मात्र या तपासणीतून काहीच निष्पन्न होत नाही.

त्यामुळे आदर्श ऊस उत्पादक, संघटनेचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्याचे संयुक्त भरारी पथक तयार करावे या संयुक्त पथकाच्या माध्यमातून सर्व साखर कारखान्याचे वजन काटे तपासावेत. केवळ शासकीय अधिकाऱ्याच्या पथका मार्फत तपासणी केली तर ती आम्हाला मान्य होणार नाही. यंदा संयुक्त पथका मार्फत तपासणी झाली नाही तर या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला आहे. यावेळी भरत चौगुले, अशोक खाडे, दामाजी डूबल, सुरेश घागरे, दिगबर कांबळे, संदीप शिरोटे, महेश जगताप, बापू मुलाणी आदीसह अन्य शेतकरी उपस्थित होते.