आटपाडी : सांगली, सातारा, सोलापूर सरहद्दीवर असणारा राजेवाडी तलाव रविवार (ता.१६) पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच तलावाच्या सांडव्यावरून पाणी आज सायंकाळ पर्यंत वाहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.
अंदाजे 140 वर्षापूर्वी माणगंगा नदीवर सांगली जिल्ह्यातील राजेवाडी (ता.आटपाडी) येथे या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या तलावाची भिंत व दारे राजेवाडी (जि.सांगली) हद्दीत आहे. तर पाणी साठा माण (जि.सातारा) हद्दीत होतो. पाऊस कमी होत असल्याने हा तलाव पाण्याअभावी सन 2019 पर्यंत सलग दहा वर्षे कोरडा ठणठणीत होता. दहा वर्षांनंतर ऑक्टोयबर २०१९, २०२०, २०२१ व चालू वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
नेहमी परतीच्या पावसाने भरणारा हा राजेवाडी तलाव यावर्षी परतीच्या पावसा बरोबरच उपसा योजना मधून सुरु असलेल्या पाण्यामुळे भरला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राजेवाडी तलावाचा सांडवा मोठ्या लांबीचा असून त्यावरून वाहणारे पाणी माणदेशातील नागरिकांना समुद्रकिनाऱ्याचा अनुभव देत आहे. त्यामुळे हा तलाव पर्यटकांसाठी खास आकर्षणही ठरला आहे. तलाव भरल्याने माण नदी प्रवाहित होणार आहे.